सातारा : शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या परदेशातील सेलिब्रिटींविरोधात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्वीट केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘ज्यांना ज्या क्षेत्रातलं कळतं त्यातलं त्यांनी बोलावं’ असा सल्ला सचिनला दिला होता. यावरून आता सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले कि, शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का, तरी ते अध्यक्ष होते.
पॉप गायिका रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता, त्यानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्वीट करत म्हटलं होतं कि, “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात परंतु यात सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. चला एक राष्ट्र म्हणून एकजूट राहू या.”
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants.
Indians know India and should decide for India. Let’s remain united as a nation.#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2021
सचिनने केलेल्या ट्विटनंतर अनेक जणांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. त्यातच शरद पवार यांनी देखील सचिनला सल्ला दिला कि, आपलं क्षेत्र सोडून इतर गोष्टी बोलताना काळजी घ्यावी.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यावर आता सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का? तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले? तरीही ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. अनेकांना वाटतं मला सोडून दुसऱ्याला कळत नाही. अशी कमी लेखण्याची पद्धत काही लोकांनी राज्यात लावली आहे. हे योग्य नसून नवीन नेतृत्वाला हानीकारक आहे.”