राजस्थान : भिलवाडा मार्गे जाणाऱ्या जयपूर-कोटा महामार्गावर हनुमान नगर येथे मंगळवारी रात्री एक भीषण अपघात झाला. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टीकड गावच्या वळणाजवळ ट्रकवर वीज कोसळल्याने ही ट्रक अनियंत्रित होऊन पलटी झाली. ट्रकमध्ये 450 घरगुती गॅस सिलिंडर भरलेले होते. ट्रक उलटताच तिला आग लागली आणि सिलिंडरचे स्फोट व्हायला सुरुवात झाली.
सुमारे अडीच तासापर्यंत एकामागे एक सिलिंडरचे स्फोट होत होते. अपघातानंतर 15 तास उलटूनही NH -५२ बंद होता. कोटा, अजमेर आणि जयपूरला जाणाऱ्या प्रवाशांना बुधवारी सकाळी अगोदरच थांबविण्यात आले होते. ही वाहतूक जहाजपूरमार्गे बसोली टर्नकडून वळवण्यात आली. बुधवारी सकाळी घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. गॅस कंपनीच्या कर्मचार्यांनाही बोलविण्यात आले. यानंतर आसपासच्या भागातून सिलिंडर्सचे तुकडे गोळा करण्याचे काम सुरू आहे. जखमी ट्रक चालकावर देवली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिलिंडर्सनी भरलेला ट्रक नसिराबादहून कोटाच्या भवानीमंडीकडे जात होता.
या अपघातानंतर लागलेली आग इतकी भयंकर होती की ही आग 5-7 किलोमीटर अंतरापर्यंत दिसत होती. हनुमान नगर पोलिस स्टेशन मधील पोलीस व अग्निशमन दल तिथे दाखल झाले, परंतु सिलिंडर्सचे भयंकर स्फोट व आगीमुळे कोणीही ट्रकजवळ जाण्याचे धाडस करू शकले नाही. या अपघातामुळे महामार्ग, टीकडसह परिसरातील खेड्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. स्फोटामुळे सिलिंडर जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत उडून पडत होते. अग्निशमन दलालाही जवळ जाता आले नाही. 35 वर्षीय ट्रकचालक सतराज मीणा याने कसा-बसा जीव वाचविला. परंतु तो अनेक ठिकाणी भाजला गेला आहे.