उत्तर प्रदेशातील बुलंदशहर मधील आरुषी गँगरेप आणि खून प्रकरणात कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणात पॉक्सो कोर्टाने (POCSO Court) तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या संपूर्ण घटनेने उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली होती. धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या या घटनेने देशात खळबळ उडाली होती.
आरुषीचे 2 जानेवारी 2018 रोजी शिकवणीतून घरी परतत असताना अपहरण झाले होते. यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली. NH -९१ वर धावत्या कारमध्ये आरुषीवर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. 4 जानेवारी 2018 रोजी, आरुषीचा मृतदेह दादरी कोतवाली परिसरातील रजवा येथे पडलेला आढळला. पोलिसांनी तपास केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी तीन जणांची नावे कुटुंबातील सदस्यांनी दिली होती. आता दोन वर्षांच्या सुनावणीनंतर आरुषीला कोर्टाकडून न्याय मिळाला आहे.
काय होतं प्रकरण ?
2 जानेवारी 2018 रोजी शिकवणीतून घरी जात असताना 16 वर्षीय आरुषीचे कारमधील तरुणांनी अपहरण केले. यानंतर तिच्यावर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला, त्यानंतर तिचा गळा दाबून खून करण्यात आला. दादरी परिसरातील कालव्यात तिचा मृतदेह फेकला. पोलिसांनी सुमारे दहा दिवसांनंतर प्रकरणाचा खुलासा केला आणि यात 3 तरुणांचा सहभाग असल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणात सिकंदराबाद येथील रहिवासी असलेले आरोपी इजराइल, जुल्फिकार आणि दिलशाद यांना अटक करून तुरुंगात पाठविण्यात आलं.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, पोलिसांचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आणि त्यांना कोर्टाने फटकारले. तत्कालीन चौकी प्रभारी यांनी सील केलेलं सामान कोर्टात सादर केलं नाही. कोर्टाने म्हटले की हे सामान केससाठी महत्त्वाचा पुरावा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तत्कालीन चौकी प्रभारी दलवीरसिंग आपला जबाब नोंदवण्यासाठी कोर्टात पोहोचले. कोर्टाने त्यांच्याकडे घटनास्थळावर सील केलेल्या वस्तू (मुलीची चप्पल, बॅग, पुस्तके, बाटली इ.) बद्दल विचारले. त्यावर त्यांनी या वस्तू आणल्या नसल्याचं समजलं. यावर न्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि यासंदर्भात एसएसपीला पत्र लिहिण्याचा इशारा दिला.




