मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह महाराष्ट्रातही ढगाळ वातावरणासोबत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि विजा कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यातील हवामानातही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहेत. मार्च महिन्यातच वळीवासारखा पाऊस पडू लागल्याने नागरिकांसह शेतकरी वर्ग चिंतेत आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील तीन ते चार दिवसांत काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
आज सांगली, सातारा, धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात अधूनमधून अवकाळी पाऊस पडत असून त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय नांदेड, हिंगोली, परभणी आणि बीड जिल्ह्यांमध्येही पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील काही भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हे अवकाळी वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल
मराठवाडा भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 11 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत.
हाताशी आलेली पिके वादळी पाऊस आणि गारपीटीमुळे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, कोकणात आज उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असला तरी राज्यातील इतर भागात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता कायम आहे. हवामानातील सतत होणारे बदल पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.




