सचिन वाझे यांना झालेली अटक व त्यांच्या निलंबनानंतर महाविकास आघाडीमध्येही ठिणगी पडल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वीच ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
विरोधकांनी विधानसभेत मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारनं वाझे यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अँटिलिया स्फोटकं प्रकरणात ‘NIA’ नं सचिन वाझे यांना अटक केली. तसंच त्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा निलंबित देखील करण्यात आलं आहे.
शिवसेनेने निलंबित असलेल्या वाझे यांना पोलीस सेवेत परत घेतलेच कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर गृहखातं अनिल देशमुख यांच्याकडं असल्यानं शिवसेनेकडून अनिल देशमुख यांच्यावर ठपका ठेवला जात आहे. त्यांना हे संपूर्ण प्रकरण नीट हाताळता आलं नाही, त्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा, असं शिवसेनेचं म्हणणं असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, मनसुख हिरेन प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी वाझे यांना पाठीशी घातलं, त्यामुळं परमबीर सिंह यांना पदावरून दूर करण्याची मागणी राष्ट्रवादीनं केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता राज्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून पुढे कोणता निर्णय घेतला जाणार, याविषयी चर्चा सुरु आहे.




