सातारा : पर्यटकांसाठी राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर, पाचगणी आजपासून (१९ जून) सुरु होणार आहे. पर्यटकांसाठी काही नियम आणि अटी लागू करुन महाबळेश्वर, पाचगणी सुरु करण्याचा निर्णय वाई प्रांताधिकाऱ्यांनी घेतला आहे.
महाबळेश्वर, पाचगणीमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावर रॅपिड अॅन्टीजेन चाचणी केली जाईल. तर हॉटेल व्यावसायिक, कर्मचारी यांना प्रत्येकी दहा दिवसानंतर तपासणी होणार आहे. टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना महाबळेश्वर पाचगणीत एन्ट्री दिली जाणार आहे. प्रांताधिकारी संगिता राजापुरे-चौगुले यांनी या संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन उद्यापासून शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. आकडेवारी कमी झाल्यामुळे सातारा जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे.
असे असतील नियम :
- सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
- हॉटेल 50 टक्के क्षमतेने 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
- रात्री 8 पर्यंत घरपोच सेवा देण्यास परवानगी
- बैठका, संस्था सभांना 50 टक्के क्षमतेने मान्यता
- व्यायाम शाळांना, जिमला 50 टक्के क्षमतेने मान्यता
- शेती व शेतीविषयक आस्थापने पूर्ण सुरू
- अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी
- लग्नात 25 लोकांना परवानगी
- मास्क न घालता फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड
- चित्रीकरणला परवानगी पण बायोबबलमध्येच
- क्रीडांगणे, खेळ सूरु पण स्पर्धा नाहीत
- धार्मिक स्थळे बंद
- बस पूर्ण क्षमतेने सुरू राहणार
- दुकानदारांनी मास्क न लावल्यास दुकान सिल करण्याचे आदेश