ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारताने १३ धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन विजय मिळवत मालिका मात्र ऑस्ट्रेलियाच्या नावावर जमा झाली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजानी केलेल्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज फक्त २८९ धावाच करु शकले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने सर्वाधिक ७५ धावा केल्या. तर मॅक्सवेलने ३८ चेंडूत ५९ धावा करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर फलंदाज फारशी चांगली कामगिरी करु न शकल्याने त्यांना विजय मिळवता आला नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात टॉस जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना ३०२ धावा केल्या. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारताला तीनशेहून अधिक धावा करता आल्या. यावेळी भारताला सलामीवीर शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात करुन दिली. पण या दोघांना मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार विराट कोहलीने ७८ चेंडूत ६३ धावा केल्या.
श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे दोघेही झटपट बाद झाले. जेव्हा कर्णधार कोहली बाद झाला तेव्हा भारताच्या फक्त १५२ धावा झाल्या होत्या. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी अधिक पडझड होऊ न देता पुढील १९ ओव्हरमध्ये तब्बल १५० धावांची भागीदारी केली. यावेळी पांड्याने ७६ चेंडूत ९२ धावा केल्या. यावेळी त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारला. तर जडेजाने ५० चेंडूत ६६ धावा केल्या. यावेळी जडेजाने देखील ५ चौकार आणि ३ षटकार ठोकले.
पहिले दोनही वनडे सामना गमवल्यानंतर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून व्हाईटवॉश टाळण्याचं मोठं आव्हान कोहली आणि टीमपुढे आहे. त्यामुळे यावेळी भारतीय संघाने तब्बल ४ बदल केले. या सामन्यात मयांक अग्रवालऐवजी शुभमन गिल, मोहम्मद शमीऐवजी शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहलऐवजी कुलदीप यादव आणि नवदीप सैनीऐवजी टी नटराजन यांना संधी देण्यात आली आहे. यापैकी फलंदाजीत शुभमन गिलने ३९ चेंडूत ३३ धावा केल्या.




