नवी दिल्ली : आरोग्य क्षेत्रात देण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर आज (मंगळवार) आयोजित वेबिनारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. त्यांनी अर्थसंकल्पातील आरोग्य क्षेत्रासाठी निर्धारित केलेल्या तरतुदी अभूतपूर्व असल्याचं म्हटलं आहे. त्याबरोबरच कोरोना काळात भारतातल्या मसाल्यांनी देखील संपूर्ण जगात विशेष स्थान मिळवलं, असंदेखील पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला देण्यात आलेला अर्थसंकल्प अभूतपूर्व आहे. देशाला वेलनेस सेंटर, जिल्हा रुग्णालय, क्रिटिकल केअर युनिट, आरोग्याच्या पायाभूत सुविधा, आधुनिक प्रयोगशाळेची आणि टेलिमेडिसीनची गरज आहे. आपल्याला प्रत्येक स्तरावर काम करायचे आहे, प्रत्येक स्तराला प्रोत्साहन द्यायचे आहे. तसेच, कोरोना काळात भारतातील औषधे आणि लसीबरोबरच आपले मसाले आणि काढे यांचे देखील मोठ्या प्रमाणात योगदान आहे, ज्याचा अनुभव आज संपूर्ण जग घेत आहे. आपल्या पारंपारिक औषधांनीही जगात स्थान मिळवले आहे, असंदेखील पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, आज जगभरात भारताच्या आरोग्य क्षेत्राची प्रतिष्ठा आणि भारताच्या आरोग्य क्षेत्रावरील विश्वास एका नवीन स्तरावर आहे. कोरोनादरम्यान भारताच्या आरोग्य क्षेत्राने जे सामर्थ्य दाखवले आहे, ते संपूर्ण जगाने बघितले आहे.




