मुंबई : कोरोनावरील कोरोनील औषधावरून सध्या वादाला सुरुवात झाली आहे. हे औषध योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली’ कंपनीनं तयार केलेलं आहे. त्यातच आता इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA) या औषधाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे याची दाखल घेऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भूमिका मांडली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले कि, “पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर ‘आयएमए’ने प्रश्न उपस्थित केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणणं आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही.”
‘जागतिक आरोग्य संघटना, आयएमए व इतर संबंधित मान्यताप्राप्त आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय कोरोनील या औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही,’ असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
पतंजलीच्या #Coronil औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर #IMA ने प्रश्न उपस्थित केले असून #WHO ने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणण आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही.(१/२)
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 23, 2021
काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हे औषध आणण्यात आले. सुरुवातीला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे औषध असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता ते संपूर्ण करोनावर मात करणारे औषध म्हणून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात या औषधाला कुठल्याही अधिकृत संघटनेकडून मान्यता मिळालेली नाही. तसं असल्यास सिद्ध करावं, हा प्रकार सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा व त्यांच्या आरोग्याशी खेळ करणारा आहे. असं ‘IMA’ ने म्हटलं आहे.