शेतीसाठी शाश्वत वीज पुरवठा व्हावा म्हणुन राज्यात मागील दोन वर्षापासुन मुख्यमंत्री सोलर पंप योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेत आतापर्यंत ३ एचपी व ५ एचपी( हॉर्सपावर) चे पंप देण्यात येत होते. आता यात ७. ५ एचपी सौरपंप संच बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृती सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री सौरपंप योजनेत आरक्षित प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ५% तर खुल्या प्रर्वगातील शेतकऱ्यांसाठी १०% लोकवाटा घेत कृषी सौरसंच बसवण्यात येत आहेत. पहिल्या टप्यात एक लक्ष सौर पंप संच बसवण्याचे महाराष्ट्र शासनाने निश्चित केले होते. शेतकरी वर्गातुन या योजनेस सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मुबलक पाणीसाठा व जास्त जमीन असणाऱ्या बागायती शेतीसाठी जास्त दाबाने पाणी मिळावं म्हणून शेतकऱ्यांची ७ .५ अश्वशक्तीचा पंप मिळावा अशी मागणी होती. ७ .५ अश्वशक्ती कृषीपंपासाठी कमीतकमी ५ एकर पेक्षा जास्त जमीन धारणा असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :
मुख्यमंत्री सौरकृषीपंप योजनेमधून मिळणाऱ्या या पंपसंचा साठी http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर जावे. पारेषण विरहीत विज पुरवठ्यासाठी लाभार्थी अर्ज पर्याय निवडून अर्ज करता येईल.
खालील कागदपत्रे सोबत अपलोड करावीत :
- आधार कार्ड
- ७ / १२ सातबारा उतारा तलाठी स्वाक्षरीत
- आरक्षित प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र
- लाईट बिल ( ग्राहक क्रमांक)
- बोअरवेल, विहीर अथवा पाणीसाठा स्त्रोताची सातबाऱ्यावर नोंद.
आपल्याला या योजनेसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आपण हा टोल-फ्री क्रमांक वापरू शकता:
- 18001023435
- 18002333435




