मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर आता मनसेकडून संपूर्ण राज्यभरात होणारी महाआरती रद्द करण्यात आली आहे. उद्या रमजान ईद आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी राज्यभर होणाऱ्या महाआरतीचा निर्णयाला स्थगिती देत आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले की, “उद्या ईद आहे, मुस्लिम बांधवांचा हा सण आनंदाने साजरा व्हावा, आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्याचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे, आणि त्याबाबत आपण पुढे काय करायचं ते मी उद्या सांगेन.”
महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/zNxanlUVpg
— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2022
मनसे आणि हिंदुत्ववादी संघटना उद्या राज्यातील प्रत्येक शाखेमध्ये महाआरती करणार होते. पण उद्या ईद असल्यामुळे राज ठाकरे यांनी ४ तारखेपर्यंत भोंगे उतवरण्याचे अल्टीमेटम दिले आहे. दरम्यान, मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरे यांनी आता ३ ऐवजी ४ मेची मुदत दिली आहे. ३ तारखेला रमजान ईद आहे. मला सणात विष कालवायचे नाही. मात्र ४ मेपासून ऐकणार नाही. ज्या मशिदींवर भोंगे असतील, त्यांच्या समोर लाऊडस्पीकर लावून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा म्हणा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले.