उत्तर प्रदेश : लग्नानंतर नवविवाहितेवर सासरच्या 6-7 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नाही तर तिच्या प्रायव्हेट पार्टला गरम चिमट्याने चटके देखील देण्यात आले. त्यानंतर क्रौर्याच्या सर्व सीमा पार करत आरोपींनी पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी घातली. पीडितेने सासरच्यांविरुद्ध असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. ही लाजीरवाणी घटना उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे २२ जून रोजी जरीफनगरमधील उस्मानपूर येथे राहणाऱ्या एका तरुणाबरोबर लग्न झाले होते. त्यानंतर ती सासरीदेखील गेली, परंतु, हवा तितका हुंडा न मिळाल्यामुळे तिच्या सासरचे लोक चिडलेले होते. त्यानंतर त्या सर्वांनी मिळून नवविवाहित मुलीवर अत्याचार करण्याची योजना आखली आणि त्यानुसार या नवविवाहितेवर भयंकर अत्याचार केले. तिच्यावर सासरच्या 6-7 जणांनी सामूहिक बलात्कार केला. यामध्ये या महिलेचा पती आणि त्याचे दोन भाऊ यांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये नवविवाहितेच्या दोन नणंदा आणि तिची मोठी जाव या त्यांना साथ देत होत्या.
सामूहिक बलात्कार करूनही त्यांचे मन भरले नाही, तेव्हा त्यांनी पीडितेच्या प्रायव्हेट पार्टला गरम चिमट्याने चटके दिले त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी घातली. तिला कोल्ड्रिंकमध्ये विष देण्याचा देखील प्रयत्न केला होता, असे पीडितेचे सांगितले आहे. याविषयी पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की त्यांच्या मुलीबरोबर भयंकर कृत्य झाले आहे. त्यांना घटनेची माहिती मिळताच ते पोलिसांकडे गेले आणि आपल्या मुलीला तिथून सोडवून घेऊन आले. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नवविवाहित महिलेसोबत हुंड्याच्या मागणीवरून हे कृत्य करण्यात आले. पीडितेने तिच्या सासरच्यांवर खूप गंभीर आरोप केले आहेत. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह तिच्या पतीलाही अटक करण्यात आली आहे. तपासात ज्या गोष्टी समोर येतील त्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.