देशातील 6 लाख आशा सेविकांनी संप पुकारला आहे. सन्मानजनक आणि वेळेवर वेतन मिळावं, त्याचबरोबर वेतन निश्चित करण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी आशा सेविकांनी संप पुकारला आहे. या मुद्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला सुनावलं आहे.
कोरोनाचा संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून अधिकाधिक चाचण्या करण्याचं काम सुरू आहे. यासाठी आशा सेविकांची मदत घेतली जात आहे. मात्र आता आशा सेविकांनी संप पुकारला आहे. आशा सेविकांच्या संपावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
देशातील प्रत्येक घरापर्यंत आशा सेविका आरोग्य सुरक्षा पोहोचवतात. खऱ्या अर्थानं त्या आरोग्ययोद्धा आहेत, पण आज स्वतःच्या हक्कासाठी संप करण्यासाठी मजबूर झाल्या आहेत. सरकार मुकं तर होतंच, कदाचित आता दृष्टिहीन आणि बहिरंही झालंय, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलंय.




