मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या नावाखाली छळ आणि बदनामी केल्याबद्दल संजय राऊत यांच्यावर आरोप लावला आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत मेधा यांनी म्हटले होते कि, संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक आहेत. माझी प्रतिमा डागाळण्यासाठी ही विधाने करण्यात आली आहेत. संजय राऊत यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप माध्यमांसमोर केला, जो बदनामीकारक असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शिवसेना नेते संजय राऊत कोणत्याही आधाराशिवाय अनुचित विधान करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. नवघर पोलिस स्टेशन, मुलुंड पूर्व, मुंबई येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी वरिष्ठ निरीक्षकांना आयपीसी कलम ५०३, ५०६ आणि ५०९ अंतर्गत एफआयआर नोंदवण्याची विनंती केली. यापूर्वी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांना मानहानीची नोटीस पाठवली होती. खरं तर, काही काळापूर्वी संजय राऊत यांनी कथित शौचालय घोटाळ्याबाबत मेधा सोमय्या यांच्यावर अनेक आरोप केले होते.
Medha Kirit Somaiya filed Rs100 Crore Defamation Suit against Shivsena Sanjay Raut today Mumbai High Court.
मेधा किरीट सोमैयानी आज मुंबई उच्च न्यायालय येथे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर 100 कोटींचा दिवाणी मानहानीचा दावा दाखल केला @BJP4India pic.twitter.com/UFlwVIwxz1
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 23, 2022
काय आहे टॉयलेट घोटाळा?
मिरा भाईंदर शहरात एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील 16 शौचालये बांधण्याच कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साढे तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
संजय राऊत यांनी घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी नगर विकास खात्याचे सचिव, एमएमआरडीए, मुंबई पोलीस, मीरा-भाईंदर पोलीस, मीरा-भाईंदर महानगरपालिका, वन खाते आदी विभागांना पत्र लिहीले होते. त्यात त्यांनी माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. कोणत्या आधारावर 100 कोटींचा घोटाळा झाला असा प्रश्नही सोमय्या यांनी विचारला होता. हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प होता, जमीन देखील सरकारची आहे, असे सोमय्या यांनी सांगितलं होतं.