मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रातील सर्व ओबीसींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणारे पत्र नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. ओबीसी समाजावर राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात अन्याय होत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात बहुजनांवर अन्याय होणे योग्य नाही, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
नाना पटोले यांनी पत्रात म्हटले आहे कि, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने दिलेल्या निवेदनातील सर्व विषयांची दखल घेऊन ओबीसी समाजाला न्याय द्यावा. अन्यथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाने “ओबीसी आक्रोश आंदोलन” राज्यभर छेडण्याचा इशारा दिला आहे, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नाना पटोले म्हणाले की, 2017 पासून ओबीसी आरक्षणाला महाराष्ट्रात ग्रहण लागलेले आहे. ते आजही संपलेले नाही. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ओबीसींना आरक्षण मिळावे आणि आता होणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाने व्हायला हव्यात. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आजही तोडगा निघालेला नाही. ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकावं यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्नही सुरु आहेत. पण राज्य सरकारला त्यामध्ये हवं तसं यश मिळताना दिसत नाही. राज्यात दोन महिन्यांपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे ओबीसी समाजातील नेते आक्रमक झाले आहेत.




