मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीच्या कारवाईपासून कोणताही दिलासा मिळाला नाही. अनिल देशमुख यांनी ईडीच्या कारवाईविरोधात आणि ईडी समन्स रद्द करण्याबाबत केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पात्र लिहून त्यात आरोप केला होता की अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदावर असताना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सीबीआय आणि ईडी या तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. ईडीने अनिल देशमुख यांना आतापर्यंत चौकशीसाठी पाच वेळा समन्स बजावले आहेत. मात्र, अद्यापही ते ईडीपुढे हजर झालेले नाहीत. याउलट त्यांनी ईडी समन्स रद्द करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला असून अनिल देशमुख यांना ईडीच्या कारवाईपासून कोणताही दिलासा मिळाला नाही. आता हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठापुढे जाण्याची शक्यता आहे.




