सोलापूर : खेळत-खेळत शेततळ्याकडे गेलेल्या तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. मोहोळ तालुक्यातील शेटफळ इथे ही घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.
मृत कार्तिकचे वडील मुकेश ज्योतिनाथ हिंगमीरे यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे भाऊजी भरत निकम हे मोलमजुरीची कामे करण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील माचनूरहुन शेटफळ ता. मोहोळ येथे आले होते. सोमवारी (९ मे) ते नेहमीप्रमाणे कामावर गेले असता दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास विनायक भरत निकम (वय १२), सिद्धार्थ भरत निकम (वय १०), दोघे रा. माचणूर, तर कार्तिक मुकेश हिंगमिरे रा. शेटफळ (वय ६) हे तिघेजण पोहता येत नसूनही नजीकच्या शेततळ्यात पोहायला गेले. पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेनंतर सर्वांनी शेततळ्यावर धाव घेतली पण तोपर्यंत उशीर झाला होता. हे शेततळे महेश तानाजी डोंगरे या शेतकऱ्याचे असून त्यांनी या शेततळ्याला नियमानुसार तारेचे कुंपन घातलेले नाही. मृत बालकांचे पालक हे भटक्या नाथपंथी डवरी समाजातील आहेत. शेततळ्याला कुंपण नसल्याची बाब उघड होऊ नये, त्यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यास विलंब केला जात होता. शेवटी माध्यमांच्या दबावानंतर रात्री उशिरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत.




