मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. मात्र, अधिवेशनाच्या अगोदर पत्रकारांना संबोधित न केल्याबद्दल भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या संदर्भात ट्वीट करत उद्धव ठाकरेंची तुलना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी केली आहे.
भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे कि, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधिमंडळ अधिवेशनापूर्वी पत्रकारांना संबोधित करण्याचे धाडस झालेले नाही. १७० आमदार पाठीशी असताना इतकेही बळ नसेल तर उपयोग काय? यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे.”
मुख्यमंत्री @OfficeofUT यांना
विधीमंडळ अधिवेशनापूर्वी पत्रकारांना संबोधित करण्याचे धाडस झालेले नाही.
१७० आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय? यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे… pic.twitter.com/Aq2cEjb8bn— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 4, 2021
राज्यात पावसाळी अधिवेशनाची घोषणा झाल्यापासून भाजपने सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवावा व विधानसभा अध्यक्षांची निवड लवकरात लवकर केली जावी, अशा मागण्या भाजपकडून सतत केल्या जात आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी थेट राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यपालांनीही तत्परतेनं फडणवीसांच्या मागण्यांची दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहित मागण्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली होती. अधिवेशनापूर्वी सरकारवर दबाव आणण्याची भाजपची ही रणनीती असून भातखळकर यांनी केलेली टीका याचाच एक भाग असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.