मुंबई : मुंबईपासून 175 कि.मी. अंतरावर असलेल्या हीरा ऑईल फील्ड्सजवळ तौक्ते वादळात अडकलेले भारतीय जहाज P-305 समुद्रात बुडाले आहे. भारतीय नौदलाने त्याच्यातील 146 लोकांना वाचवलं आहे, तर 130 पेक्षा अधिकजण बेपत्ता आहेत. या ठिकाणी आणखी एक भारतीय जहाज अडकले आहे. त्यात 137 लोक असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी 38 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
भारतीय नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक माधवाल म्हणाले की, INS कोच्चीला पी -305 या बोटीच्या मदतीसाठी पाठविण्यात आले होते. शोध व मदत कार्यांसाठी INS तलवारला देखील तैनात करण्यात आले आहे. दुसरे जहाज GAL कन्स्ट्रक्टर वरुनही आणीबाणीचा संदेश मिळाला आहे, ज्यात १77 लोक आहेत आणि ते मुंबई किनाऱ्यापासून आठ नॉटिकल मैलांवर आहे. त्याच्या मदतीसाठी INS कोलकाता रवाना करण्यात आले आहे. नेव्ही हेलिकॉप्टर देखील तयात ठेवलेले आहेत, हवामानात थोडी सुधारणा झाल्यावर त्यांना बचावकार्यात जोडता येईल.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाच्या 11 डायव्हर्स टीम तयार ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे. बारा पूरमदत दल आणि वैद्यकीय पथकेही तैनात करण्यात आली आहेत. चक्रीवादळग्रस्त राज्यांमध्ये गरज पडल्यास त्यांना पाठविले जाईल.