नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज चौथा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. पण सर्वसामान्यांच्या खिशावर कोणता भार वाढणार आणि कोणाकडून दिलासा मिळणार? हे जाणून घेऊयात…
काय महाग आणि काय स्वस्त
काय होणार स्वस्त?
- अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनविण्यावर भर देण्यात आला आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी मोबाईल फोन चार्जर, मोबाईल फोन कॅमेरा लेन्स, ट्रान्सफॉर्मर इत्यादींवर शुल्क सवलत जाहीर केली आहे.
- रत्ने आणि दागिने उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने कापलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील कस्टम ड्युटी 5% पर्यंत कमी केली आहे. सिंपली सॉंड डायमंडवर कस्टम ड्युटी लागणार नाही.
- चामडे, कापड, कृषी साहित्य, पॅकेजिंग बॉक्स, मोबाईल फोन चार्जर आणि रत्ने आणि दागिने स्वस्त होतील.
काय होणार महाग?
- बजेटमध्ये कृत्रिम दागिन्यांच्या आयातीला परावृत्त करण्यासाठी सरकारने आता त्यावरील आयात शुल्क 400 रुपये प्रति किलो केले आहे. इमिटेशन ज्वेलरीवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे, जेणेकरून त्याची आयात कमी करता येईल. अशा परिस्थितीत हे दागिने आगामी काळात महाग होऊ शकतात.
- पावसात भिजण्यापासून संरक्षण करणाऱ्या छत्र्या आतापासून महाग होणार आहेत. सरकारने अर्थसंकल्पात त्यांच्यावरील कर वाढवून 20% केला आहे. यासोबतच छत्री बनवताना वापरल्या जाणाऱ्या पार्टसवरील करमाफी रद्द करण्यात आली आहे.
- याशिवाय या वर्षी ऑक्टोबरपासून नॉन-मिश्रित इंधनावर प्रति लिटर 2 रुपये या दराने एक्ससाईझ शुल्क आकारण्यात येणार आहे.
लघु आणि मध्यम उद्योगांना दिलासा देत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात स्टील स्क्रॅपवरील कस्टम ड्युटी सवलत एका वर्षासाठी वाढवली आहे. यामुळे एमएसएमई क्षेत्रातील स्क्रॅपमधून पोलाद उत्पादने बनवणाऱ्यांना सोपे जाईल.