आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी आता फक्त 3 दिवस बाकी आहेत. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेची सुरुवात होईल, आणि सात वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानला मिळाला आहे, पण टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत खेळले जाणार आहेत. टीम इंडिया या स्पर्धेसाठी दुबईत पोहचली आहे.
बीसीसीआय निवड समितीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी अखेरच्या क्षणी दोन बदल केले आहेत. तसेच, तीन खेळाडूंना नॉन-ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून समाविष्ट केले आहे. परंतु, या तिघांमधील एका खेळाडूला दुखापत झाल्यामुळे त्याला महत्त्वपूर्ण सामन्याला मुकावे लागण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 11 फेब्रुवारी रोजी बीसीसीआयने याबाबत माहिती दिली आणि त्याच्या जागी हर्षित राणा याला समाविष्ट केले. यशस्वी जयस्वालला मुख्य संघातून बाहेर करीत मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याचा समावेश केला गेला आहे.
आता नॉन-ट्रॅव्हलिंग रिझर्व्हमधील यशस्वी जयस्वालला दुखापतीमुळे रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतील मुंबई विरुद्ध विदर्भ सामन्यातून बाहेर पडावे लागण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, यशस्वीने डाव्या घोट्यात वेदना होत असल्याची माहिती टीम मॅनेजमेंटला दिली आहे.
मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 17 फेब्रुवारीपासून नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.




