नवी दिल्ली : जागतिक क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने झाले नाहीत. राजकीय संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका झाल्या नाहीत. पण आता दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पुन्हा एकदा दोन्ही देशातील क्रिकेट सुरू होण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात. दहशतवादाच्या मुद्द्यावर दोन्ही देशातील संबंध बिघडल्यामुळे सुमारे १० वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने झाले नाहीत. या दोन्ही देशात २००७ साली अखेरची द्विपक्षीय मालिका झाली होती. तेव्हा पाकिस्तानने पाच वनडे आणि तीन कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौरा केला होता. पण २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले.
दोन्ही देशातील क्रिकेट पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डा (PCB)ने देशातील सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केली आहे. पाकिस्तानमधील उर्दू वृत्तपत्र ‘डेली जंग’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. सर्व काही ठीक झाले तर या वर्षाच्या दुसऱ्या सत्रात दोन्ही संघात ३ सामन्यांची टी-२० मालिका होऊ शकते, असं वृत्तात म्हटलं आहे.




