ऑस्ट्रेलियाने अखेरचा T२० सामना १२ धावांनी जिंकला. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची खेळी केली. तरीही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अखेरचा सामना भारताने गमावला असला तरीही टी-२० मालिका भारताने २-१ ने जिंकली आहे.
कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेड(80) आणि मॅक्सवेल(५४) जोडीने चौफेर फटकेबाजी केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच(0) सुंदरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर मॅथ्यू वेड आणि स्टिव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यानंतर सुंदरने स्टिव्ह स्मिथला(24) बाद केलं. मॅथ्यू वेडने अर्धशतक झळकावलं. ग्लेन मॅक्सवेलनेही आपल्याला मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेतला. वेड आणि मॅक्सवेल जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. दरम्यान शार्दुल ठाकूरने वेडला तर नटराजनने मॅक्सवेलला माघारी धाडलं. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने २ तर नटराजन आणि शार्दुलने १-१ बळी घेतला.
१८७ धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. ग्लेन मॅक्सवेलच्या पहिल्याच षटकात लोकेश राहुल माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी भारताचा डाव सावरणार असं वाटत असतानाच स्वेप्सनने शिखर धवनला माघारी धाडलं. यानंतर संजू सॅमसननेही आपली विकेट गमावली. श्रेयस अय्यरही शून्यावर बाद झाला. यानंतर विराटने हार्दिक पांड्याच्या साथीने फटकेबाजी करत भारताचं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. परंतू १८ व्या षटकात झॅम्पाने पांड्याला बाद केलं. १९ व्या षटकात अँड्रू टायने विराटला बाद केलं. त्यानंतर भारतीय संघाच्या विजयाच्या आशा मावळल्या.




