मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या भारतात परतताना कस्टममध्ये अडकल्याची बातमी सोशल मीडियावर आगीसारखी पसरली होती. हार्दिक पांड्याच्या दोन घड्याळांची किंमत जवळपास 5 कोटी रुपये आहे. हार्दिकच्या या 2 घड्याळांनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर आता हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया समोर आली आहे. हार्दिक पांड्याने या आरोपांबाबत मौन सोडले असून त्याने ट्विटमध्ये संपूर्ण सत्यता सांगितली आहे.
हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया
दुबईहून मुंबईत परतलेल्या हार्दिक पांड्याकडून विमानतळावर सीमाशुल्क विभागाने दोन आलिशान घड्याळे जप्त केल्याची बातमी आहे. हार्दिक पांड्याने ट्विट करून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्याने लिहिले की, ‘१५ नोव्हेंबरला सकाळी दुबईहून मुंबईला पोहोचल्यावर मी दुबईहून खरेदी केलेल्या वस्तूंसाठी कस्टम ड्युटी भरण्यासाठी विमानतळावरील कस्टम काउंटरवर गेलो. सोशल मीडियावर माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे. मी स्वतः विमानतळावर उपस्थित असलेल्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांना सर्व सामानाची माहिती दिली आहे.
पांड्याने पुढे सांगितले कि, “कस्टम विभागाने माझ्याकडून सर्व कागदपत्रे मागवली आहेत. सध्या ते योग्य मूल्यमापन करण्यात गुंतले आहेत. मी पूर्ण शुल्क भरण्यास तयार आहे आणि सोशल मीडियावर घड्याळाची जी किंमत ५ कोटी सांगितली जात आहे, ती चुकीची आहे. या घड्याळाची किंमत दीड कोटी रुपये आहे.
— hardik pandya (@hardikpandya7) November 16, 2021
पांड्या पुढे म्हणाला की मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि मी सर्व सरकारी संस्थांचा आदर करतो. मला मुंबई कस्टम विभागाकडून पूर्ण सहकार्य मिळत असुन मी कस्टम विभागाला पूर्ण सहकार्याची खात्री देतो आणि मी त्यांना हे प्रकरण क्लीअर करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व कायदेशीर दस्तऐवज प्रदान करेल. माझ्यावर कायदेशीर सीमा ओलांडल्याबद्दल केलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत.
हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये फ्लॉप ठरला आहे. तो पाच मॅचच्या तीन इनिंगमध्ये फक्त 69 रन्स करू शकला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याला टीम इंडियातून वगळण्यात आले आहे. हार्दिक पांड्याच्या जागी व्यंकटेश अय्यरचा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.




