मुंबई: एकनाथ शिंदे यांचा कोणताही बालेकिल्ला नाही, त्यांनी पैशांच्या जोरावर काही बालेकिल्ले उभे केले आहेत. शिंदे यांनी ५० वर्षांत कोणतं महान कार्य केले आहे की बालेकिल्ले उभारले? ते काय लोकमान्य टिळक आहेत? त्यांची विचारधारा काय आहे? ते काय वल्लभभाई पटेल आहेत? दीनदयाळ उपाध्याय आहेत? अटलबिहारी वाजपेयी आहेत? ज्या दिवशी अमित शाह राहणार नाहीत, त्यादिवशी यांची टेकडीसुद्धा राहणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांसोबत कसला रूसवा-फुगवा, एका विशिष्ट मुद्द्याबद्दल आम्ही शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या. ज्या महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो, त्यांनी कोणतं महान कार्य केलं? इतका शूर योद्धा महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार मिळावा? महाराष्ट्र सदनमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली हा कार्यक्रम घेतला गेला. लोकांचा गैरसमज झाला की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हा पुरस्कार दिला, पण तो साहित्य संमेलनाचा कार्यक्रम नव्हता, तो एक खासगी कार्यक्रम होता. शरद पवारांची फसवणूक झाली, हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता, त्यामुळे आमचं आक्षेप त्यावर आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
ही लोकशाही आहे, दोन स्वतंत्र विचारधारांमध्ये मतभेद आहेत. आमचं एखाद्या व्यक्तीविषयीचं मत हे टोकाचं आहे. शरद पवारांचा पक्ष फोडण्याच्या मुद्द्यावरही आमचं मत तेच आहे. शिवसेना आणि शरद पवारांचा पक्ष अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी फोडला, ते त्यांना हाताशी धरून हे करीत आहेत. आमच्या भावना टोकाच्या आहेत, भांडण असण्याचा प्रश्न नाही, आम्ही फक्त आमचं मत मांडलं, असं राऊतांनी सांगितलं.
दरम्यान, आज दिल्लीमध्ये संध्याकाळी संजय राऊत आणि शरद पवार हे एकाच मंचावर असणार आहेत. एक पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात दोघं उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे यांना पवारांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यानंतर राऊत यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.




