रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदीजवळ आज सकाळी मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. काल बांधकाम मंत्र्यांकडून रखडलेल्या या महामार्गाच्या कामाची पाहणी देखील करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बावनदी स्टॉपजवळ आज (21 फेब्रुवारी 2025) सकाळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे तरुण जागीच ठार झाले. हा मालवाहतूक ट्रक (MH 08 HD 8292) गोव्यातून मुंबईच्या दिशेने निघाला होता. मात्र, बावनदी पुलाजवळ आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रक महामार्गावर एका बाजूच्या खोदून ठेवलेल्या भागात गेला. हा ट्रक लोखंडी वजनदार पाईपने भरलेला असल्याने अपघातानंतर ट्रकमधील सर्व लोखंडी पाईप थेट ट्रकच्या केबिनमधून बाहेर पडले. त्यामुळे केबिनचा चक्काचूर होऊन केबिनमध्ये असलेल्या चालक मोहम्मद अफ्तार समशेर अली (वय 22, रा. नागनाथपूर जिल्हा सुलतानपूर) याच्यासह त्याचा सहकारी महंमद गुलाम रजब अली (वय 21 राहणार इब्राहिमपूर जिल्हा प्रतापगड) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग वाहतूक केंद्रचे हेड कॉन्स्टेबल नाटेकर यांच्यासह इतर पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून दोन तरुणांचा मृतदेह रत्नागिरीत पाठविण्यात आला. अपघातप्रकरणी पुढील कार्यवाही ग्रामीण पोलीस करीत आहे.




