बेंगळुरू : ऑपरेशन सिंदूर संदर्भात मोठा खुलासा करताना भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांनी शनिवारी सांगितले की, भारताच्या हवाई संरक्षण जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींनी पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक AEW&C/ELINT विमान नष्ट केले. हे विशेष लष्करी विमान हवाई देखरेख आणि पूर्वसूचना यासाठी डिझाइन केलेले होते.
बेंगळुरू येथे आयोजित वार्षिक ‘एअर मार्शल कात्रे व्याख्यान’ कार्यक्रमात बोलताना एअर चीफ मार्शल सिंग यांनी सांगितले की, पाकिस्तानी लढाऊ विमाने ३०० किलोमीटर अंतरावर पाडण्यात आली. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानातील जैकबाबाद येथे पाकिस्तानी हवाई दलाची काही पार्क केलेली एफ-१६ लढाऊ विमाने देखील भारतीय हवाई दलाने यशस्वीरित्या नष्ट केली.
या खुलाशामुळे भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूरची व्याप्ती आणि भारतीय हवाई दलाची लढाऊ क्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे.




