नवी दिल्ली : 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ठोस आणि कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या भीषण हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता तर 17 जण जखमी झाले होते. या घटनेनंतर केंद्र सरकारने तातडीने ऍक्शन मोड घेत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा तत्काळ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांच्या राज्यांमध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना लवकरात लवकर देशाबाहेर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय, भारताने भारत-पाकिस्तानमधील सिंधू पाणी करार स्थगित करण्याचाही मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. 1960 पासून लागू असलेला हा करार पाकिस्तानसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत मानला जातो. पाकिस्तानची 21 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या सिंधू आणि तिच्या उपनद्यांवर अवलंबून आहे.
अधिक कठोर पावले उचलताना केंद्र सरकारने अटारी सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 1 मेपर्यंत या मार्गाने परत जाण्याची अंतिम मुदत दिली आहे. भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या संरक्षण सल्लागारांना देखील एका आठवड्याच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या उच्चायोगांमधील कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी करण्यात आली असून ती 50 वरून 30 इतकी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.