नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानावर सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांच्याविरुद्ध लखनौ न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना बेजबाबदार विधाने करू नका असा इशाराही दिला.
आजच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, “जर भविष्यात त्यांनी सावरकर आणि स्वातंत्र्यसैनिकांबद्दल अशा प्रकारचे विवादास्पद विधान केले, तर न्यायालय त्या विधानाची दखल घेईल.”
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात पुढे असेही म्हटले आहे की, राहुल गांधी यांना त्यांचे विधान तपासण्याची आणि त्यावर योग्य विचार करण्याची आवश्यकता आहे. न्यायालयाने असंही स्पष्ट केलं की, “तुम्ही महाराष्ट्रात असे विधान केले आहे. तेथे लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांची पूजा करतात. तुमच्या आजीनेही सावरकरांचे कौतुक करणारे पत्र देखील लिहिले होते. महात्मा गांधी जेव्हा ब्रिटीश अधिकाऱ्यांना पत्रे पाठवत असत, तेव्हा ते त्यात ‘तुमचा विश्वासू सेवक’ असं लिहीत होते. मग तुम्ही महात्मा गांधींना इंग्रजांचे सेवक म्हणणार का?”
न्यायालयाच्या या टिप्पणीतून राहुल गांधी यांना इशारा देण्यात आला की, स्वातंत्र्यसैनिकांबद्दल अपमानजनक किंवा अनादरपूर्ण वागणूक स्वीकारली जाणार नाही आणि स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान इतिहासात असामान्य आहे. सावरकर यांच्या संदर्भातील राहुल गांधींच्या विधानाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीरपणे दखल घेतली आहे. न्यायालयाने ठामपणे सांगितले की, स्वातंत्र्यसैनिकांवर भाष्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यांच्या गौरवाला ठेच पोहोचवणारे विधान अस्वीकार्य आहे. त्यांचा सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.”
लखनौ न्यायालयाचे समन्स:
याआधी, लखनौ न्यायालयाने राहुल गांधी यांच्याविरुद्ध एक समन्स जारी केला होता. त्यामध्ये राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या कथित अपमानजनक वक्तव्यामुळे कोर्टात हजर होण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर राहुल गांधी यांचे वकील सर्वोच्च न्यायालयात गेले आणि या प्रकरणाच्या संदर्भात स्थगिती मिळवली.
सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या विरोधातील लखनौ न्यायालयाचे समन्स स्थगित करत, त्यांना भविष्यकालीन वक्तव्यांवर अधिक सावध राहण्याचा इशारा दिला आहे. याचा अर्थ, न्यायालयाने या प्रकरणात राहुल गांधींना दिलासा दिला असला तरी, त्यांनी पुन्हा अशा प्रकारची बेजबाबदार विधानं केली, तर त्याविरोधात आम्ही स्वतःहून दखल घेऊ, असे स्पष्ट केले.