नागपूर : देशातील 30 टक्के वाहन परवाने बोगस असल्याचा धक्कादायक खुलासा केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी आपले अधिकारी आणि इंजिनियर्स यांना बोगस लायसन्स तसेच रस्त्यावरचे मृत्यू यासाठी जवाबदार धरले आहे. ते रस्ता सुरक्षा अभियानाच्या एका कार्यक्रमात नागपूरमध्ये बोलत होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी आपल्याच विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं आहे. वाहन परवाना घ्यायला सर्वात सोपा देश भारत आहे. आरटीओ ऑफिसर्सची माफी मागतो. पण, गांधीजी दिसले की मारा ठप्पा. सांगायला लाज वाटते पण 30% लायसन्स बोगस आहेत, असा दावा देखील त्यांनी केला. गरीब माणसालाही सुरक्षा हवी. एअर बॅग्स फक्त मोठ्या गाड्यांना का? सर्व गाड्यांना एअर बग्स हव्या, असे मत गडकरी यांनी व्यक्त केलं.
पैसे मिळाले की आरटीओ अधिकारी लायसन्स देतात अशी टीकाही त्यांनी केली आहे. तर रस्त्यावरच्या अपघाताला गडकरींनी आपल्याच इंजिनियर्सला जबाबदार धरले. रोड इंजिनियरिंग महत्वाचे आहे. अर्ध्या रस्त्यावरच्या मृत्यूंना तर इंजिनियर जबाबदार आहे. ह्यांचा डी पी आर, ह्यांचे लोक इतके फ्रॉड आणि बोगस आहेत. मी आता 12000 कोटी रुपये खर्च करून ब्लॅक स्पॉट्स ठीक केले आहे. पुणे-कोल्हापूर रस्त्यावर जयसिंगपूर येथे 150 लोकांना रस्ता वाकडा असल्यामुळे जीव गमवावा लागला. पण, कोणी काही केले नाही. तो मी ठीक केला आता कोणी तिथे पडत नाही, असंदेखील गडकरी यांनी यावेळी सांगितलं.




