उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. येथे पतीसोबत वाद झाल्यानंतर एका महिलेने स्वतःची जीभ कापून घेतली. बिजनौर जिल्ह्यातील रसूलपूर नागला गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बबली आणि ब्रह्मपाल यांचं 10 वर्षापूर्वी लग्न झालं आहे. या दोघा पती-पत्नीचे वारंवार वाद होत असायचे. रविवारी देखील या जोडप्याचे जोरदार भांडण झाले. यावेळी महिलेचा पती तिला म्हणाला कि, ‘तू भांडकुदळ बाई आहेस.’ मात्र, या शब्दांमुळे ही महिला इतकी दुखावली गेली की तिने टोकाचं पाऊल उचललं. ही महिला दुकानात जाऊन ब्लेड घेऊन आली आणि ब्लेडने आपल्या पतीसमोर स्वतःची जीभ कापून रस्त्यावर फेकून दिली.
घटनेनंतर या महिलेचे खूप रक्त वाहून गेले, तिला तात्काळ अमरोहा येथील धानोरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु, तिची प्रकृती गंभीर आहे. बबली आणि ब्रह्मपाल यांना दोन मुलंही आहेत.




