कर्नल श्यामसिंह भाटी यांचे गुरुवारी रात्री उशिरा निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. बांगलादेशच्या मुक्तीसाठी भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी मैनामतीच्या प्रसिद्ध लढाईचा नायक अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.
कर्नल श्यामसिंह भाटी यांचा जन्म 1941 मध्ये जोधपूरच्या तापू गावात झाला. त्यांचे वडील ठाकूर खेतसिंह भाटी जोधपूर रियासतच्या सरदार इन्फंट्रीमध्ये अधिकारी होते. दुसर्या महायुद्धात ते सहभागी होते. कर्नल श्याम सिंग यांचे शिक्षण जोधपूरमध्ये झाले. 1963 मध्ये त्यांनी सैनिकी जीवनाची सुरूवात भारतीय सैन्याच्या सर्वात जुन्या राजपुताना रायफलने केली. १९६५ ते 1971 च्या भारत-पाक युद्धामध्ये त्यांनी अदम्य शौर्याचे उदाहरण उभे केले. सैन्यात 34 वर्षे सेवा केल्यानंतर त्यांनी आयुष्यभर तरुणांना भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित केले. सैन्य पार्श्वभूमी असलेल्या कुटूंबातील कर्नल श्याम सिंह यांचा मुलगा कर्नल संग्राम सिंग यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. 1999 मध्ये कारगिल युद्धाच्या वेळी दाखवलेल्या पराक्रमाबद्दल कर्नल संग्राम यांना शौर्य चक्र देण्यात आले.
लेफ्टनंट जनरल ओपी कौशिक यांनी 9 डिसेंबर 1971 रोजी रात्री बांगलादेशात मैनामतीच्या लढाईबद्दल एक लेख लिहिला होता. यात त्यांनी सांगितले की मनमती येथे राजपूताना रायफल्सच्या सैन्याने मेजर श्याम सिंग यांच्या नेतृत्वात महत्त्वाचे स्थान मिळवले होते, परंतु पाकिस्तानच्या एका अख्ख्या ब्रिगेडने या पथकाला वेढले होते. अशा परिस्थितीत मेजर श्याम सिंह यांनी मुख्यालयाची मदत मागितली, परंतु मागून मदत मिळण्याची शक्यता कमी होती.
भारतीय टॅन्क (रणगाडे) पुढे जाऊ शकत नव्हते. त्याचवेळी अन्य सैन्य दुसऱ्या मोर्चांवर लढा देत होते. कंपनी कमांडरने हवाई दलाची मदत मागितली, परंतु ते ढाका येथे बॉम्बहल्ला करण्यात व्यस्त होते. राजपूताना रायफलचे 38 सैनिक शहीद झाले होते. शत्रूचे टॅन्क अवघ्या 200 फूट अंतरावर उभे होते. जिवंत राहण्याची कोणतीही आशा नव्हती. अशा परिस्थितीत ब्रिगेड कमांडरने कोर कमांडर लेफ्टनंट जनरल सगत सिंग यांना याबाबत माहिती दिली. कोर कमांडर सागतसिंग, ब्रिगेड कमांडर ब्रिगेडिअर पांडे आणि कमांडिंग ऑफिसर बरार यांनी मेजर श्यामसिंग यांना तेथून माघार घेण्याचे आदेश दिले.
मेजर श्यामसिंह यांनी त्वरित माघार घेण्यास नकार दिला आणि जिवंत असेपर्यंत माघार घेणार नाही असे सांगितले. मेजर श्यामसिंग म्हणाले की आपण या जागेवर फारच कठीण परिस्थितीत ताबा मिळवला आहे. आता माघार घेताच समोर उभे असलेले टॅन्क आम्हाला उडवून देतील. शत्रूचे टॅन्क 200 फूट अंतरावर उभे आहेत. आणि आम्ही गोळीबार करीत आहोत. कर्नल बरार म्हणाले की मागे न हटल्यास ती सर्वस्वी तुमची जबाबदारी समजली जाईल. पूर्ण जबाबदारी घेत मेजर श्यामसिंह यांनी आपण आपली जागा सोडणार नाही असे स्पष्ट केले.
लेफ्टनंट जनरल ओ.पी. कौशिक यांनी लिहिले पुढे लिहिले कि, हे संभाषण ऐकून त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. नंतर हे सिद्ध झाले की मेजर श्यामसिंह यांचा निर्णय योग्यच होता. त्याच वेळी आम्ही हवाई दलाला एक रेडिओ संदेश पाठविला. उत्तर मिळाले की त्यांनी त्यांचे सर्व बॉम्ब ढाका वर टाकले होते. त्यांच्या विमानात एकही बॉम्ब शिल्लक नाही. आम्ही त्यांना पाकिस्तानी टॅन्कवर अगदी कमी उंचीवरून उड्डाण करण्यास आणि त्यांच्यात भीती निर्माण करण्यास सांगितले. भारतीय वैमानिकांनीही तेच केले. त्यांनी 2-3 वेळा त्यांच्या टॅन्कवर अगदी खालून उड्डाण केले आणि सांगितले की आम्ही इथे पोहोचलो आहोत. थोड्याच वेळात पाकिस्तानी टॅन्क ब्रिगेडने माघार घ्यायला सुरुवात केली. दरम्यान, भारतीय टॅन्क पुढे गेले आणि तेथे पोहोचले. अशा पद्धतीने रणशक्तीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्या मैनामती टेकडीवर भारतीय सैन्याने आपला ताबा कायम राखला.




