पुणे : राज्यात अनेक ठिकाणी काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याकडून पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यात पुढील चोवीस तासांत 204.4 मिलिमिटर पेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर गुरुवार नंतर राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
तसेच आज मुंबईसह ठाणे परिसरात हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.




