रायगड : रायगड जिल्ह्यातील काशीदनजीकच्या नाल्यावरील पूल रविवारी मुसळधार पावसामुळे कोसळला. यावेळी मुंबईच्या दिशेने निघालेली कार पाण्यात पडली आणि भायदे कुटुंबीय गाडीत अडकले. मात्र त्यांच्या ९ वर्षांच्या मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे गाडीतील सर्वजण थोडक्यात बचावले. यामुळे गाडीतील सहा प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सागर भायदे, त्यांची पत्नी, दोन मुले आणि त्यांच्या पत्नीच्या दोन मैत्रिणी हे सर्वजण कारने पनवेल येथून मुरूड येथील नातेवाईकांकडे गेले होते. सायंकाळी परतत असताना, काशीदनजीकच्या नाल्यावरील लहान पूल अचानक कोसळला आणि पुलावर असलेली भायदे यांची कार पाण्यात पडली. त्यानंतर हे सहाजण गाडीत अडकले. मात्र भायदे यांचा नऊ वर्षांचा मुलगा श्री याने प्रसंगावधान दाखवले. तो गाडीची फुटलेली काच तोडून बाहेर आला. त्याला बघून त्याचे वडीलदेखील गाडीतून बाहेर आले. त्यानंतर सागर भायदे यांनी मुलगा श्री याला पोहत रस्त्याच्या कडेला आणले. त्यानंतर श्री गावातील माणसांकडे पळत गेला आणि त्याने त्यांना घडलेली सर्व घटना सांगितली आणि त्यांच्याकडे मदत मागितली. गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेत भायदे कुटुंबीयांची मदत केली आणि त्यांना सुखरूप पाण्याबाहेर काढले. ९ वर्षांच्या श्रीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.




