रायगड : मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी प्रवासी बसचा रविवारी रात्री उशिरा रायगड जिल्ह्यातील कर्नाळा खिंडीत भीषण अपघात झाला. या अपघातात सध्या मिळालेल्या माहितीनुसार दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींवर पनवेल आणि कळंबोली येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. बोरिवलीहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे जाणारी ओमकार ट्रॅव्हल्सची खासगी बस (MH 47 Y 7487) कर्नाळा खिंडीत नागमोडी वळणावर आली असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली. या अपघातामुळे बसमधील अनेक प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले, तर काही प्रवासी बसमध्ये अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पनवेल तालुका पोलीस, पनवेल महानगरपालिका आणि कळंबोली फायर ब्रिगेडच्या रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी क्रेन आणि ॲम्बुलन्सच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
जखमींना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय आणि पनवेल येथील गांधी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. एमजीएममध्ये सुमारे 23 प्रवासी उपचार घेत आहेत, तर गांधी हॉस्पिटलमध्ये दोन जखमींवर उपचार सुरू आहेत. काही जखमींना प्राथमिक उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे, तर काहींची स्थिती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळत आहे.
अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी रात्रभर प्रयत्न करून वाहतूक पूर्ववत केली.
दरम्यान, उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर ही बस प्रवाशांनी भरलेली होती. महिलांसह लहान मुले आणि वयोवृद्ध प्रवासी देखील बसमध्ये होते. दरवर्षी सुट्टीच्या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने खासगी बससेवा मोठ्या प्रमाणावर सुरु असते. याच काळात हा अपघात घडला.
कर्नाळा खिंडीत नागमोडी वळणांमुळे आणि रस्त्यावरील अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली असून, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे शासनाच्या दुर्लक्ष करण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अपघाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. बसचालकावर निष्काळजीपणाचा गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.