मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा आहे. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. परमबीर सिंह भारतातच असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने यावेळी दिली. आता याप्रकरणी पुढील सुनावणी ६ डिसेंबरला होणार आहे.
आज झालेल्या सुनावणीत परमबीर सिंह यांच्या वकिलाने सांगितले की, परमबीर सिंह भारतात असून ते नेपाळला गेल्याची चर्चा चुकीची आहे. परमबीर सिंग यांनीही आपण सीबीआयसमोर हजर राहण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर न्यायालयाने दिलासा देत त्यांच्या अटकेला स्थगिती दिली.
सुनावणीदरम्यान परमबीर सिंह यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले कि, “सिंह यांच्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील खटला मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असून तसे न केल्यास अनेक गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. परमबीर सिंग कुठेही फरार होऊ इच्छित नाहीत. महाराष्ट्रात येताच पोलिसांकडून त्यांच्या जीवाचा धोका असल्याने ते समोर येत नाहीत.”
या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त मुंबईत येऊन राहण्यास घाबरतात हे आश्चर्यकारक आहे. न्यायमूर्ती एस.के. कौल म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त मुंबई पोलिसांपासून आपल्याला धोका असल्याचे सांगत असतील तर त्यातून कोणता संदेश जातो? सिंग यांच्या वकिलांनी सांगितले की, त्यांनी माजी गृहमंत्री देशमुख यांच्यावर पैसे उकळण्याचे रॅकेट चालवल्याचा आरोप केला असल्याने त्यांना गोवण्यात येत आहे.