मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने सरनाईक यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर छापे मारले आहेत. मुंबई आणि ठाण्यातील ठिकाणांवर झाडाझडती घेतली जात आहे. प्रामुख्याने बांधकाम क्षेत्र व निवासी संकुलांशी संबंधित विविध प्रकल्पांत गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरु झाले आहे. प्रताप सरनाईक घरी नाहीत हे पाहून धाड टाकलीये. ही नामर्दानगी आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या या आरोपांवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं.
‘शिवसेनेच्या आरोपांना उत्तर देतांना प्रवीण दरेकर यांनी ट्विट केलं आहे. प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली, यात कसली मर्दानगी, असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांना विचारलं पाहिजे, एक महिला घरी नसताना. सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं, यात कोणती मर्दानगी,’ असा पलटवार प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
“प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली,यात कसली मर्दानगी”,असं म्हणणाऱ्या @rautsanjay61यांना विचारलं पाहिजे,एक महिला घरी नसताना…सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं, यात कोणती मर्दानगी होती?@BJP4Maharashtra @TV9Marathi @abpmajhatv @TheMahaMTB
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) November 24, 2020
संजय राऊत यांनी म्हटलं होतं कि, प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही काळात अर्णव गोस्वामी, कंगना राणावत व अन्वय नाईक ही प्रकरणं सरनाईक यांनी लावून धरली. त्या आकसातूनच त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. पण आम्ही पर्वा करत नाही. आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. नोटिसा कसल्या पाठवता? घरी या. अटक करायची तर अटक करा. प्रताप सरनाईक घरी नाहीत हे पाहून धाड टाकलीय. ही नामर्दानगी आहे. भाजपनं सरळ लढावी. शिखंडीसारखं ईडी, सीबीआयचा वापर करून लढत असलात तरी विजय आमचाच होईल.