मुंबई : महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र, पुढील तीन-चार दिवसांत राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही तासांत राज्यातील ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.




