मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी १ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी मुख्यमंत्री निर्णय घेत अधिकृत जाहीर करतील अशी माहिती दिली होती. त्याप्रमाणे १ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत.
आदेशात नमूद केलेले महत्वाचे मुद्दे :
- ठाकरे सरकारने निर्बंध अजून कठोर केले असून बाहेरुन राज्यात येणाऱ्या लोकांना आरटीपीआसीरआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे निगेटिव्ह आरटीपीआसीरआर टेस्ट रिपोर्ट असं बंधनकारक असून प्रवेश कऱण्याच्या ४८ तास आधी हा रिपोर्ट काढलेला असावा असं आदेशात नमूद आहे.
- कार्गो कॅरिअरमध्ये चालक आणि क्लिनर अशी दोघांनाच परवानगी असणार आहे. जर हे कार्गो कॅरिअर बाहेरच्या राज्यातून प्रवेश करत असतील तर निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारक असून ४८ तासांच्या आत तो काढलेला असावा.
- औषधं आणि कोरोनाशी संबंधित सामग्रीसाठी प्रवास करावा लागणाऱ्या विमानतळ आणि बंदरावरील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
- एखाद्या ठिकाणी निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे हक्क देण्यात आले असून यासाठी निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास आधी नोटीस द्यावी असं सागंण्यात आलं आहे.
- दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांना निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.
- बाजारपेठेत गर्दी झाल्यास स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाने त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे
राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात १४ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधामुळे राज्याचा रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. कोरोना बाधितांचा आकडा कमी झाला असला तरी काही जिल्हयात बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सध्याचे निर्बंध आणखी १५ दिवस वाढविण्याची मागणी बहुतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. त्यानुसार राज्य सरकारने निर्णय घेत १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत निर्बंध कायम ठेवले आहेत.