मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी आज राजभवन येथे राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या मंत्रिमंडळात त्यांना डावलण्यात आले होते. मात्र, सुमारे सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भुजबळ यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन झाले आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदासाठी भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना अटक झाल्यानंतर, तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर संबंधित आरोपींशी जवळीक असल्याचे आरोप झाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी मार्चमध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर राष्ट्रवादीच्या वाट्याच्या मंत्रिपदाची जागा रिक्त होती. दुसरीकडे, मंत्रिमंडळात सहभागी न झाल्याने छगन भुजबळ यांची नाराजी शिगेला पोहोचली होती. इतकी की, ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. अखेर, पक्षांतर्गत समेटानंतर भुजबळ यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान देण्यात आले आहे.
भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. याआधीही त्यांनी हे खाते सांभाळले असून, त्यांच्या अनुभवाचा सरकारला फायदा होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.




