औरंगाबाद : वडिलांनी स्वत:च्याच मुलीवर अकरा वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही मुलगी अगदी लहान असताना सुरू झालेला अत्याचार इतके वर्ष सहन केल्यानंतर अखेर तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. ती पळून गेल्यानंतर अल्पवयीन असल्याने मुकुंदवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध घेतला. मात्र, चौकशीत तिने ११ वर्षे वडिलांनी केलेल्या अत्याचाराबद्दल सांगितल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तिच्या ४० वर्षीय वडिलांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडित मुलगी तिची आई, लहान भाऊ व वडिलांसह गारखेडा परिसरात राहते. सध्या बारावीचे शिक्षण घेतलेल्या राणीला शिक्षणाची आवड आहे. त्यामुळे घरची परिस्थिती बेताची असली तरी दहावीनंतर एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळावा यासाठी ट्यूशन लावली. ती रोज मुकुंदवाडी परिसरात ट्यूशनला जात होती. नेहमीप्रमाणे २६ मे रोजी पीडित मुलगी शिकवणीला गेली, मात्र घरी परतलीच नाही. त्यामुळे तिच्या आईने मुकुंदवाडी पोलिसांकडे तक्रार केली.
निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासासाठी पथक रवाना केले. त्यानंतर पोलिसांना अंबेजोगाईत ही मुलगी सापडली. पोलिसांनी तिला जवाब नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आणले. मात्र, ती अस्वस्थ होती. त्यानंतर, महिला अधिकाऱ्यांनी मुलीला पळून जाण्याचे कारण विचारले तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
तिच्या वडिलांवर २०१३ मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात तो तुरुंगात देखील गेला होता. नंतर जामिनावर सुटल्यानंतर त्याने स्वत:च्या मुलीवर अत्याचार करणे सुरूच ठेवले. तो खासगी वाहनचालक आहे, तर मुलीची आई मजुरी करते. निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी हा प्रकार निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना सांगितलं. यांनी या नराधमावर स्वतंत्र बलात्कार, बाललैंगिक अत्याचाराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.