औरंगाबाद : अग्निवीर भरतीमध्ये मैदानी चाचणीदरम्यान धावत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान औरंगाबादमध्ये घडली. करण नामदेव पवार (वय- २०, रा. विठ्ठलवाडी, सिर्जापूर, ता. कन्नड, जि औरंगाबाद) असे मृत तरुण उमेदवाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील करण आणि सागर हे दोन सख्खे भाऊ अग्निवीर भरतीसाठी बुधवारी संध्याकाळी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दाखल झाले होते. यावेळी रात्रीच्या दरम्यान मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यावेळी करणने मैदानाचे तीन चक्कर पूर्ण केले होते. मात्र शेवटचा चक्कर पूर्ण करण्यासाठी अवघे पाच फूट अंतर शिल्लक असताना करण अचानक मैदानात कोसळला. त्याला तात्काळ शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या तरुणाचा मृत्यू नक्की कसा झाला ते शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. या घटनेमुळे करणच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.