इम्रान खान यांची पाकिस्तानच्या सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली असून माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ हे नवे वझीर-ए-आझम बनण्याच्या मार्गावर आहेत. सोमवारी पाकिस्तानच्या संसदेत नव्या पंतप्रधानांची घोषणा होणार आहे. शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान होण्यापूर्वीच आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. जोपर्यंत काश्मीर प्रश्न सुटत नाही तोपर्यंत भारतासोबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे राजकारण भारतापासून सुरू होते आणि भारतावर वक्तव्ये करून संपते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. आपली सत्ता गमावण्याच्या भीतीने जनतेला वारंवार संबोधित करताना इम्रान खान यांनी भारताचे कौतुक केले, तर दुसरीकडे नवे पंतप्रधान होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या शाहबाज शरीफ यांनी भारताविरोधात वक्तव्य केले आहे. पंतप्रधानपदाचे नामांकन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शाहबाज शरीफ म्हणाले की, जोपर्यंत काश्मीर प्रश्न सुटत नाही तोपर्यंत भारतासोबत कोणतीही चर्चा होणार नाही.
दरम्यान, पाकिस्तान सध्या राजकीय संकटाव्यतिरिक्त महागाई, वाढती बेरोजगारी आणि ट्रिलियन्सचे विदेशी कर्ज यांच्याशी झगडत आहे. इम्रान खान यांच्यानंतर शाहबाज शरीफ यांच्यासमोर पाकिस्तानला खंबीरपणे उभे करणे हे नवे आव्हान आहे. परंतु, आपल्या लोकांना नोकऱ्या देण्याऐवजी आणि महागाई नियंत्रणात आणून देशाच्या आर्थिक बळावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ते काश्मीर मुद्द्यावर गप्पा मारत आहेत.