भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज(११ फेब्रुवारी) शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीचं कारण स्पष्ट केलं. यावेळी उदयनराजे म्हणाले, “शरद पवार यांची भेट घेण्यामागचं कारण म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा होता. आमची एकच मागणी आहे, जेवढं गांभिर्याने महाराष्ट्र शासनाकडून बाजू मांडायला हवी होती, ती मांडली गेली नाही. त्यामुळे लोकांच्या मनात मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.”
ते पुढे म्हणाले कि, “आज मराठा समजातील लोकांची एवढीच अपेक्षा आहे की, अन्य समाजातील लोकांना ज्याप्रमाणे आरक्षण दिलं गेलं. त्याचप्रमाणे कुणाचाही आरक्षणाला धक्का न लावता, आम्हाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे. शरद पवार हे मराठा समाजातील ज्येष्ठ व राजकारणात सक्रीय आहेत आणि आज राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसची जी सत्ता आहे, त्याचे सर्वेसर्वा शरद पवार हे आहेत. त्यामुळे एक वडिलकीच्या नात्याने त्यांनी यामध्ये लक्ष घालावं. अन्यथा फार मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल. याअगोदर शांततेत मोर्चे निघाले, पण जर आरक्षण मिळालं नाही तर काय होईल हे सांगता येणार नाही, त्याची कल्पना देखील करता येणार नाही.”




