चंद्रपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) बफर झोनमध्ये वाघांच्या हल्ल्यात दोन बांबू तोडणाऱ्या मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील शैसावी गावाचे रहिवासी बुधसिंग श्यामलाल मडावी (वय ४१) यांचा चंद्रपूर वन परिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ३८१ मध्ये वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तर मध्य प्रदेशातील सारी परिसरातील रहिवासी प्रेमसिंग उदे (वय ५५) यांचा कंपार्टमेंट क्रमांक ३५७ मध्ये वाघाने हल्ला करून जीव घेतला.
या दोन्ही घटनांची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्राथमिक आर्थिक मदत देण्यात आली आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात वाघांच्या वाढलेल्या हालचाली लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव बफर झोनमधील बांबू तोडण्याचे काम तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. तसेच, त्या भागातील इतर कामगार आणि जवळच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, वाघांच्या हालचालींवर वन विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.




