IND vs ENG 3rd Test : तिसर्या कसोटी सामन्यात भारताने दुसर्या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. दुसर्या डावात इंग्लंडने भारताला 49 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने कोणताही गडी न गमावता अवघ्या 7.4 षटकांत पूर्ण केलं. रोहित शर्माने 25 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 25 धावा काढल्या तर शुभमन गिल 21 चेंडूत 1 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 15 धावांवर नाबाद राहिला.
अक्षर पटेलने या कसोटीच्या पहिल्या डावात 38 धावा देऊन सहा विकेट घेतल्या आणि दुसऱ्या डावात 32 धावा देऊन पाच विकेट घेतल्या. यासह तो दिवस-रात्र कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. या कसोटीत सात बळी घेणाऱ्या अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 400 बळी पूर्ण केले. कसोटी सामन्यात असा पराक्रम करणारा तो भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी अनिल कुंबळे, कपिल देव आणि हरभजन सिंग यांनी कसोटीत 400 बळी घेतले आहेत. अश्विन कसोटीतील वेगवान 400 विकेट्स घेणारा जगातील दुसरा गोलंदाज बनला आहे. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 112 धावा केल्या. यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 145 धावा करू शकला. अशाप्रकारे पहिल्या डावात भारताने 33 धावांची आघाडी मिळवली होती. यानंतर इंग्लंडचा संघ दुसर्या डावात 81 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताला 49 धावांचे लक्ष्य मिळाले, जे भारतीय संघाने एकही विकेट न गमावता 7.4 षटकांत पूर्ण केले.




