टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 303 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 302 धावा केल्या. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने नाबाद 92 धावा केल्या. या खेळीत पांड्याने 1 सिक्स तर 7 चौकार लगावले. रवींद्र जडेजाने 50 चेंडूत 5 फोर आणि 3 सिक्ससह नाबाद 66 धावा केल्या. जडेजा आणि हार्दिक या जोडीने सहाव्या विकेटसाठी नाबाद 154 धावांची भागीदारी केली.
मयांक अग्रवालच्या अनुपस्थितीत युवा शुभमन गिल शिखर धवनच्या सोबतीला सलामीसाठी आला. आश्वासक सुरुवात केल्यानंतर शिखर धवन शेन अबॉटच्या गोलंदाजीवर सोपा झेल देऊन माघारी परतला. यानंतर कर्णधार विराटने शुभमन गिलच्या साथीने महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. शुभमन ने यादरम्यान काही फटके खेळले. फिरकीपटू अॅगरने शुभमनला माघारी धाडत भारताला मोठा धक्का दिला. यानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलही फारशी चमक न दाखवता माघारी परतले. कर्णधार विराट कोहलीने 5 चौकारांच्या मदतीने 78 चेंडूत 63 धावांची झुंजार खेळी केली. यामध्ये विराटने 5 चौकार लगावले. ऑस्ट्रेलियाकडून अॅश्टन अॅगरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. अॅडम झॅम्पा, जोश हेझलवुड आणि सीन एबोट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.




