कर्णधार म्हणून विराट कोहली टी-२० वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरला आहे. भारताला सलग दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड कपपूर्वीच कोहलीने टी-२० संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे सांगितले आहे. आता विराट कोहलीकडून वन-डे संघाचे नेतृत्व काढून घेण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सरचिटणीस जय शहा यांनी पुढील दोन-तीन दिवसांत निवड समिती सदस्यांसोबत ऑनलाइन बैठक बोलावली आहे.
पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्ड कप होत असून, २०२३चा वन-डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. या वर्षी तरी भारतीय संघाला वन-डे सामने खेळायचे नाहीत. पुढील वर्षीही भारतीय संघाचे फारसे वन-डे सामने नाहीत. पुढील वर्षी जूनपर्यंत भारतीय संघ केवळ तीन वन-डे, तर एकूण १७ टी-२० सामने खेळणार आहे. त्यामुळे कोहलीच्या वन-डेबाबतचा निर्णय आता घ्यावा की नाही, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
पुढील वर्ल्ड कपसाठी अकरा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या संघातील खेळाडूंचा फॉर्म आणि तंदुरुस्ती यावरही चर्चा केली जाणार आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या काही युवा खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. यात सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप मिळविलेला ऋतुराज गायकवाड याचे नाव आघाडीवर आहे. सर्वाधिक विकेट घेणारा आवेश खान, फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल यांना संधी मिळू शकते. जम्मू-काश्मीरच्या उमरान मलिकचेही नाव चर्चेत आहे. अष्टपैलू वेंकटेश अय्यरला पंड्याच्या जागी स्थान मिळू शकते. अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, उमेश यादव यांना पुन्हा संधी मिळू शकते.




