मुंबई : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या छावा या सिनेमाला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यांचा मुघलांकडून झालेला अनन्वित छळ या सिनेमातून दाखवण्यात आला आहे. अनेकांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्कर हिने या सिनेमाबाबत ट्वीटरवरुन आक्षेपार्ह पोस्ट केली आहे.
स्वरा भास्करने काय ट्विट केले?
स्वरा भास्करने तिच्या एक्स अकाउंटवर लिहिले आहे की, चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असेल किंवा संताप व्यक्त करत असेल आणि गैरव्यवस्थापनामुळे व चेंगराचेंगरी होऊन लोकांचे भयानक मृत्यू झाल्यानंतर मृतदेह बुलडोझरने काढण्यापेक्षा जास्त संताप चित्रपटातील सीन पाहून येत आहे, तर तो समाज मेंदूने आणि आत्म्याने मृत आहे.’
A society that is more enraged at the heavily embellished partly fictionalised filmy torture of Hindus from 500 years ago than they are at the horrendous death by stampede & mismanagement + then alleged JCB bulldozer handling of corpses – is a brain & soul-dead society. #IYKYK
— Swara Bhasker (@ReallySwara) February 18, 2025
छावा हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील महाराज संभाजींच्या भूमिकेसाठी विकी कौशलची खूप प्रशंसा होत आहे. चित्रपटातील एका दृश्यात ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांकडून छळताना दाखवण्यात आले आहे, त्यावर प्रेक्षकांनी खूप भावनिक प्रतिक्रिया दिल्या. हे सर्व बघताना लोकांचे अश्रू थांबत नव्हते आणि त्यांना मुघलांची चीड येत होती. पण स्वरा भास्करने चित्रपटाबाबत अशी टिप्पणी केली, ज्यामुळे हे ट्विट व्हायरल झाले आणि लोकांचा राग शिगेला पोहोचला आहे. नेटकऱ्यांनी तिच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.
‘छावा’ हा सिनेमा लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला असून दिनेश विजन हे या सिनेमाचे निर्माते आहेत. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाला संपूर्ण भारतातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका निभावली आहे, तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारताना दिसत आहे. याशिवाय अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. हा सिनेमा शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित आहे.




