मानवाधिकार परिषदेच्या 45 व्या अधिवेशनात भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करणाऱ्या पाकिस्तान, तुर्की आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) ला भारताने मंगळवारी जोरदार फटकारले. तुर्कीने जम्मू-काश्मीरचा उल्लेख केला तेव्हा भारताने टर्कीला भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये भाष्य न करण्याचा सल्ला दिला आणि लोकशाही प्रक्रियेची अधिक चांगली समज विकसित केली पाहिजे असे सांगितले.
“भारताचे अविभाज्य अंग असलेल्या जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासंदर्भात OIC ने मांडलेला मुद्दा आम्ही फेटाळून लावतो. OIC ला भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. OIC स्वत:चा पाकिस्तानला गैरवापर करु देत आहे. पाकिस्तानला असे करु देणे स्वत:च्या हिताचे आहे का? याचा OIC ने विचार करावा” असे जीनेव्हामधील भारताच्या स्थायी मिशनचे प्रथम सचिव पवन बाथे आपल्या उत्तरात म्हणाले.
“आपल्या वाईट उद्देशांसाठी भारतावर खोटे आरोप करुन, बदनामी करण्याची पाकिस्तानची नेहमीची सवय आहे. पाकिस्तान तर संयुक्त राष्ट्राच्या निर्बंध यादीत नाव आलेल्या लोकांना पेन्शन देतो. आपल्या देशातील वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांवर सतत छळ करणाऱ्या पाकिस्तानला इतर देशांना मानवाधिकारांवर भाषणे देण्याचा अधिकार नाही” अशा शब्दात पवन बाथे यांनी मानवी हक्क परिषदेच्या सत्रात पाकिस्तानवर टीका केली.




